केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय; BP, डायबिटीज व कर्करोगाची देशभरात मोफत तपासणी होणार.!!!
मोदी सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी (NCDs) देशव्यापी तपासणी मोहीम जाहीर केली आहे. ही तपासणी मोहीम 20 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजित केली जाईल.
आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, वय वर्षे 30 पेक्षा जास्त असलेल्या लोकांनी जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रातून या आजारांसाठी तपासणी करावी.
आरोग्य मंत्रालयाने काय केले आवाहन?
“तुमच्या आरोग्याची घ्या जबाबदारी’ या मथळ्याखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. 20 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान होणाऱ्या असंसर्गजन्य आजारांच्या (NCD) देशव्यापी तपासणी मोहिमेत सामील व्हा आणि तुमच्या जवळच्या सरकारी आरोग्य सुविधांमध्ये मोफत तपासणी करा,” असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सदर पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सर्व सरकारी आरोग्य सुविधा देणारी केंद्र आगामी काळात लोकांची तपासणी मोहीम राबवतील. उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग यासाठी देशव्यापी विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
मधुमेहाची प्राथमिक लक्षणे काय, कशी घ्याल काळजी?
मंत्रालयाने पोस्टसोबत इन्फोग्राफिकमध्ये मधुमेहाची लक्षणाबाबतची सूची देखील प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये दुर्लक्ष करू नका, योग्य वेळी तपासणी करून काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आलेले आहे. यामध्ये “अंधुक दृष्टी, भूक वाढणे, जखमा बऱ्या होण्यास उशीर होणे, थकवा, सतत तहान लागणे, अचानक वजन कमी होणे आणि वारंवार लघवी होणे या लक्षणांचा समावेश आहे.
एनसीडी आजारांमध्ये देशभरात लक्षणीय वाढ, चिंतेचा विषय..!
“मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!” मंत्रालयाने म्हटले आहे. देशात एनसीडीमध्ये लक्षणीय वाढ होत असतानाही ही तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (ICMR-NIN) च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृत्युदरांपैकी 66 टक्के एनसीडी आहेत. हृदयरोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसन रोग आणि कर्करोग यांचे ओझे देखील सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे. विशेषतः 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे.
पंतप्रधानांनी सांगितले व्यायाम व आहाराचे महत्त्व..!
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहरादून येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडू आणि इतर प्रतिनिधींना संबोधित करताना निरोगी शरीराचे महत्त्व अधोरेखित केले. जे निरोगी मनाची गुरुकिल्ली आहे, ज्यामुळे निरोगी राष्ट्र निर्माण होऊ शकते. फिट इंडिया चळवळीबद्दल बोलताना, त्यांनी संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करून व्यायाम आणि आहाराचे महत्त्व देखील सांगितले. अन्नातील अस्वास्थ्यकर चरबी आणि तेल कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी दररोज तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचा अभिनव सल्ला दिला होता.