परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरेंवर वाळू माफियांचा हल्ला, नेमकं प्रकरण काय.?
जालना :-
विधीमंडळात आमदार बबनराव लोणीकर यांनी अवैधरित्या होत असलेल्या वाळू उत्खननाचा विषय मांडला. वाळू माफीयांकडून होणाऱ्या सशस्त्र हल्ल्याविषयीही ते बोलले. जालना जिल्ह्यामध्ये दिवसरात्र वाळू चोरी सुरु आहे.
महसूल पथकावर सशस्त्र हल्ला होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. महसूल विभाग संघटनेचे अध्यक्ष अंबड तहसीलदार विजय चव्हाण, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यासह सर्व तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परतूरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला. इथल्या इंदिरानगर भागात अवैध गौण खनिज उत्खनन सुरु होतं. त्यावेळी छापा मारण्यास गेलेल्या परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. त्यांनी या हल्ल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अमजद कुरेशी, इरफान युनू शेख, इलियास कुरेशी, जुनेद आणि इतर काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमजद कुरेशी , सुजाहिद मतीन खतीब, एजाज खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
तहसीलदार गोरे गुरुवारी रात्री त्यांच्या खाजगी वाहनातून जात होत्या. त्यावेळी काही जण जेसीबीद्वारे अवैध खनिज उत्खनन करून ते हायवात भरत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी चौकशी करताच जेसीबी व हायवा चालवणारे पळून गेले. गोरे यांनी मग त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर पारडगाव शिवाराजवळ सहा ते सात वाळू माफिया गोरेंवर हल्ला करायला आले. या माणसांनी गोरे यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. त्यामुळे गोरे जमिनीवर पडल्या. त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. जेसीबी व हायवा घेऊन ती सगळी टोळी पसार झाली.
जालना जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी रिता मैत्रवार तसेच अंबड, घनसावंगी, मंठा, जाफराबाद, जालना, परतूर या सगळ्या तालुक्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठ्यांवर अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत. वाळू माफियांच्या टोळी युद्धामध्ये मारामारी आणि खून होत असतात. पिस्तूल परवाना देण्यासाठी अनेक मंडल अधिकारी व तलाठ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. वाळू चोरी आणि वाळू माफियांची दादागिरी यामुळे प्रशासनावरचा ताण वाढला आहे.