एसटी प्रवासात महिलांचे हाप तिकीट बंद होणार.?
उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली महत्वाची माहिती..
मुंबई :-
राज्यातील महिलांना एसटीने प्रवास करताना 50 टक्के सवलत दिली जाते. याचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका विधानामुळे महिलांना मिळणारी ही सवलत बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊयात.
एसटी दररोज 3 कोटी रुपये तोट्यात – प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आमच्या बहिणींना 50 टक्के सवलत, तसेच जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये सवलत मिळत आहे. त्या सवलतींमुळे परिस्थिती अशी झाली की एसटी बस दरदिवशी तब्बल 3 कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असं वाटतं की एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल.’
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.?
प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर राज्यातील महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद तर होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे यांनी सवलत बंद होणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे, त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही.’ एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे राज्यातील महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.