
सावधान ! भुसावळात मृत्यूचे जाळे; लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला
भुसावळ प्रतिनिधी :- अरुण तायडे
शहरातील नागरी वस्त्यांमध्ये विजेच्या तारा अक्षरशः मृत्यूचे जाळे बनून लोंबकळत आहेत. वीज वितरण कंपनीच्या खांबांमधील या सैल तारांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
या भागात ‘शॉक’ बसण्याची भीती
शहरातील मुख्य रहिवासी भाग असलेल्या प्रभात कॉलनी मार्ग, सेंट अलायसेस शाळेचा मागील परिसर आणि अयोध्या नगरातील विठ्ठल मंदिर परिसर या ठिकाणी परिस्थिती अत्यंत भयानक आहे. दोन खांबांमधील तारा सैल होऊन जमिनीच्या दिशेने इतक्या खाली आल्या आहेत की, त्यावरून मोठी वाहने जाणेही कठीण झाले आहे.
शाळेचा परिसर ठरतोय ‘डेन्जर झोन’
सेंट अलायसेस शाळेच्या परिसरात सकाळी आणि दुपारी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. येथे वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये विजेच्या तारा अडकल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसाळ्यात येथे ‘शॉर्टसर्किट’ होऊन मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशी भीती पालक प्रतिनिधी मोना चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
सैल झालेल्या तारांची तातडीने ओढ देऊन दुरुस्ती करावी.
विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्यांची त्वरित छाटणी व्हावी.
शहरातील वीज यंत्रणेची नियमित तपासणी करून धोकादायक खांब बदलावेत.प्रशासनाने आता कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करावे, जेणेकरून कोणत्याही निष्पाप नागरिकाचा बळी जाणार नाही, अशी अपेक्षा भुसावळकर व्यक्त करत आहेत.



