फक्त कॉल करून तुमच्या खात्यातून पैसे कसे चोरतात सायबर ठग, घ्या की काळजी.!!!
सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिजिटल अरेस्टने तर अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.
अनेक सायबर ठग काही मिनिटात तुमची आयुष्यभराची कमाई चोरू शकतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात काही सायबर गुन्हेगारीची अशी देखील प्रकरणे समोर आली आहेत ज्यात ओटीपीशिवाय अनेकांच्या खात्यातील पेसै चोरीला गेले आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे.
तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये सुरक्षित ठेवायचे असेल तर सायबर गुन्हेगारीबाबत तुम्ही सतर्क असणे गरजेचे आहे. सध्या सायबर ठगांनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ‘कॉल मर्जिंग टेक्निक’ असे या युक्तीचे नाव आहे. यात फक्त एक फोन येतो आणि तो तुम्ही उचलल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. याचा उपयोग करून अनेकांच्या मेहनतीचा पैसा ठगांनी लुटला आहे. अशा अनेक तक्रारी पोलिसांत देखील दाखल झाल्या आहेत.
काय आहे कॉल मर्जिंग टेक्निक.?
अनेक सायबर गुन्हेगार कॉल मर्जिंग टेक्निकचा वापर करत आहे. यात तुम्हाला एक कॉल येतो आणि काही वेळातच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. सायबर गुन्हेगार ‘कॉल मर्जिंग टेक्निक’ वापरून लोकांना फसवण्यासाठी कॉल करतात. हा अनोळखी नंबरवरून आलेला कॉल तुम्ही उचलला तर समोरची व्यक्ती तुम्हाला सांगतेकी त्याला तुमचा नंबर तुमच्या जवळच्या मित्राकडून मिळाला आहे. तो तुम्हाला मित्राचे नाव देखील सांगेल. यानंतर सायबर फसवणूक करणारा तुम्हाला एखाद्या खास कार्यक्रमाबाबत सांगेल आणि तुम्हाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करेल. त्यानंतर तो तुम्हाला सांगेल की तुमचे मित्र देखील लाईनवर येणार आहे. तुम्हाला त्याचा कॉल येईळ तो तुम्ही मर्ज करू करा अशी विनंती देखील तो करेल.
इथेच संपूर्ण खेळ घडतो…
तुम्ही कॉल मर्ज केला की इथेच संपूर्ण खेळ घडतो. मित्राचा कॉल आहे असे समजून तुम्ही कॉल्स मर्ज करताच तुमचा बँक बॅलन्स लुटला जातो. खरं तर हा कॉल कोणत्याही मित्राचा नाही तर ठगांनी तो ओटीपी मिळविण्यासाठी केलेला असतो. आजकाल ओटीपी मेसेज किंवा कॉलद्वारे शोधता येतो. तुम्ही दुसरा कॉल मर्ज करताच त्यावर OTP ऐकू येतो. सायबर फसवणूक करणाराही हा कॉल ऐकत असते. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच समोरचा फसवणूक करणारा त्याचे काम करतो आणि तुमचे अकाउंट रिकामे करतो.
सायबर तज्ञांनी दिला हा सल्ला…
येथे अनेकजण एकच चूक करतात की ते अनोळखी नंबरवरून आलेले दोन इनकमिंग कॉल मर्ज करतात. सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या फसवणुकीची ही नवीन पद्धत सर्वात जास्त प्रचलित आहे. तज्ज्ञांच्या मते सायबर गुन्हेगारांना तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी फक्त OTP ची आवश्यकता असते. यासाठी तो नवनवीन युक्त्या वापरत राहतो. त्यामुळे तुम्ही कायम सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.