तळीरामांना मोठा फटका-=- एप्रिलपासून दारूच्या किमतीत १५ टक्के वाढ होणार.!!!
राज्यातील तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता एप्रिल २०२५ पासून दारूच्या किमतीत १५ टक्के दरवाढ करण्याचा विचार सरकार करत आहे.
यामुळे बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. तसेच, सामान्य ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. महत्वाचे म्हणजे, दिवाळीपासून आतापर्यंत राज्यात दारूच्या किमतीत तीन वेळा वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा या किमतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर आर्थिक वर्षात बार आणि हॉटेल व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी ८.२६ लाख रुपये भरावे लागले. परंतु नियमानुसार, दरवर्षी केवळ १० टक्के दरवाढ अपेक्षित असते, त्यामुळे वाढीची रक्कम ८२,६५२ रुपये असायला हवी होती. मात्र, शासनाने यंदा १५ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना १,२३,९७८ रुपये भरावे लागतील. म्हणजेच दरवाढीमुळे हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट चालकाला ४१,३२६ रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम
दारूच्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचेही बजेट कोलमडणार आहे. दारूच्या किमती वाढल्यानंतर सध्या २६० रुपयांना मिळणारी व्हिस्की २८० ते २८५ रुपयांना मिळू शकते. यापूर्वी दिवाळीच्या काळात सर्वच प्रकारच्या मद्याच्या किमती वाढल्या आहेत. तसेच, रेड वाइन आणि पोर्ट वाइनच्या किमतीतही मोठी वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा एप्रिलपासून सर्वच प्रकारच्या दारूवर दरवाढ होणार आहेत.
दरम्यान, दारू केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे. विविध संशोधनानुसार मद्यपानामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. अगदी एका ड्रिंकमुळेही शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अनेक गावात दारूबंदी करण्यात आली आहे. तसेच, दारू पासून सुटका करण्यासाठी सरकारने आता किमतींमध्ये वाढ केली आहे. आता या दरवाढीमुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोघांवरही मोठा आर्थिक भार पडणार आहे.