महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.!!!

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.!!!

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे यांच्या वतीने शिवजयंती २०२६ निमित्त आयोजित भव्य शिव चित्रकला स्पर्धा दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र, मराठा मंडळाच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात उत्साहात पार पडली.

या उपक्रमासाठी मेघना साने यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी ठाण्यातील विविध शाळांशी संपर्क साधून स्पर्धेची माहिती पोहोचवली. आयोजकांनी इयत्ता पहिली ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी असे दोन गट निश्चित केले होते. दोन्ही गटांसाठी स्वतंत्र रेखाचित्रे देऊन रंगभरण्याची स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेला ठाण्यातील विविध शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत आपले कलाकौशल्य सादर केले. त्यांच्या कल्पनाशक्ती, रंगसंगती आणि सौंदर्यदृष्टीचा प्रभावी आविष्कार या स्पर्धेत दिसून आला. पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांनीही दर्जेदार चित्रे साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ठाण्यातील सुप्रसिद्ध कलासक्त व्यक्तिमत्त्व अर्चना देशपांडे जोशी, सृजनशील कलाकार व मराठा मंडळाचे पदाधिकारी राजन तावडे तसेच कलाक्षेत्रातील जाणकार मृणाल दुखंडे यांनी काम पाहिले. त्यांनी सर्व चित्रांचे निष्पक्ष, काटेकोर आणि बारकाईने परीक्षण केले. दर्जेदार चित्रांमुळे निवड करताना परीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले.

पूर्वनियोजित प्रत्येकी तीन पारितोषिकांऐवजी दोन्ही गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी दोन अशी एकूण बारा चित्रे पारितोषिकासाठी निवडण्यात आली. तसेच दोन्ही गटांत प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या बारा विद्यार्थ्यांना दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती दिनी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कार आणि शिवचरित्राविषयी आदर निर्माण होत असून, अशा स्पर्धा भविष्यातही सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प मराठा मंडळ, ठाणे यांनी व्यक्त केला आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!