जळगावमहाराष्ट्रसामाजिक

नर्सरीतील चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शंभर टक्के बंद शहरातील व्यवहार ठप्प.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज भडगाव शहरात सर्वपक्षीय वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाले होते.

दिनांक 16 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोल्हा नाल्याच्या पाण्यात पडून नर्सरीत शिकणाऱ्या अंश सागर तहसिलदार वय-३वर्ष ६ महिने व मयांक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय- ४ वर्ष २ महिने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण भडगाव शहरात स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले, बसस्टँड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रस्ता, पाचोरा रस्ता, पेठ भागातील लहान-मोठी दुकाने पूर्णतः बंद होती. खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांवरही बंदचा परिणाम दिसून आला. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.

या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा तैनात बंदोबस्त होता. बंद काळात कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, सदर घटनेतील आठ ते दहा आरोपी अद्याप फरार असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, शाळेचे संचालक मंडळ बखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज दुपारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार शितल सोलाट व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना देण्यात आले

एकूणच, चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी भडगाव शहराने दाखवलेली एकजूट लक्षवेधी ठरली असून बंद शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे चित्र दिसून आले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!