मनोरंजनमहाराष्ट्रराजकीय

राज्य शासनाचा चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

राज्य शासनाचा चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ६० व्या (२०२२) आणि ६१ व्या (२०२३) राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम, स्व. राज कपूर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर व छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कारांचे वितरण डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, संचालक बिभीषण चवरे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रकर्मी, रसिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ पासून सुरू झालेली ही परंपरा आज वटवृक्षासारखी बहरली आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. मराठी कलाकारांनी छोट्या-मोठ्या पडद्यावर, ओटीटीवरही असामान्य कामगिरी केली आहे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, अनुपम खेर, महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे आणि भीमराव पांचाळे यांच्या योगदानाचे विशेष गौरव त्यांनी केला.

या सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेत्री काजोल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना तर छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांना प्रदान करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले की, मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी आता परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. राज्यभरातील चित्रीकरणासाठी सुलभ सुविधा पुरवण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. एफएम रेडिओवर मराठी गाणी व कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील नेटफ्लिक्सवरही मराठी चित्रपटांना स्थान मिळावे यासाठी चर्चाही केल्याचे ते म्हणाले.

६० वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ निवडण्यात आला. दिग्दर्शक प्रविण तरडे (धर्मवीर), सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), अभिजीत देशपांडे (हर हर महादेव) यांना दिग्दर्शनासाठी सन्मानित करण्यात आले. अभिनय विभागात प्रसाद ओक (धर्मवीर), अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी) यांना पुरस्कार प्राप्त झाले. संगीत विभागात निहार शेंबेकर (समायरा), मनिष राजगिरे (धर्मवीर), आर्या आंबेकर (चंद्रमुखी) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘समायरा’ (सामाजिक) आणि ‘गाभ’ (ग्रामीण) या चित्रपटांना देण्यात आले.

६० व्या पुरस्कारांत इतर विजेते असे – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘पॉन्डीचेरी’, क्रमांक ३ ‘हर हर महादेव’, सहाय्यक अभिनेता योगेश सोमण (अनन्या), सहाय्यक अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी), विनोदी अभिनेता संजय नार्वेकर (टाईमपास ३), प्रथम पदार्पण अभिनेता जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही), प्रथम पदार्पण अभिनेत्री ऋता दुर्गुळे (अनन्या), उत्कृष्ट कथा सुमीत तांबे (समायरा), पटकथा तेजस मोडक व सचिन कुंडलकर (पॉन्डीचेरी), संवाद प्रविण तरडे (धर्मवीर), गीते अभिषेक खणकर (अनन्या), पार्श्वसंगीत हनी सातमकर (आतूर), पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), पार्श्वगायिका आर्या आंबेकर (चंद्रमुखी), अमित घुगरी (सोयरिक), नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), कला दिग्दर्शन महेश कुडाळकर (उनाड), छायालेखन अभिजीत चौधरी / ओंकार बर्वे (४ ब्लाइन्ड मेन), प्रियशंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही), संकलन एस. सुर्वे (काटा किर्रर्र), ध्वनिमुद्रण सुहाश राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), ध्वनिसंयोजन लोचन कानविंदे (हर हर महादेव), वेशभूषा उज्ज्वला सिंग (ताठकणा), रंगभूषा सुमेध जाधव / सौरभ कापडे (ताठकणा), बालकलाकार श्रीनिवास पोकळे (छुमंतर), अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय), प्रथम पदार्पण निर्मिती झेनिथ फिल्म्स (आतूर), प्रथम पदार्पण दिग्दर्शक प्रताप फड (अनन्या), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक ऋषी देशपांडे, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक अनुप जत्राटकर.

६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०२३ मध्ये उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘भेरा’ निवडला गेला. दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे (भेरा), महेश लिमये (जग्गु आणि ज्युलिएट), सुधाकर रेड्डी (नाळ २) यांना दिग्दर्शनासाठी गौरविण्यात आले. अभिनय विभागात अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट) आणि रिंकू राजगुरू (आशा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत विभागात अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर), मोहित चौहान (घर, बंदूक, बिर्याणी), ऋचा बोंद्रे (श्यामची आई) यांना पुरस्कार मिळाले. विशेष पुरस्कार ‘आशा’ (सामाजिक), ‘जिप्सी’ (ग्रामीण) आणि ‘श्यामची आई’ (राष्ट्रीय सन्मान) या चित्रपटांना देण्यात आले.

६१ व्या पुरस्कारांत इतर विजेते – उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ ‘जग्गु आणि ज्युलिएट’, क्रमांक ३ ‘नाळ २’, विनोदी अभिनेता उपेंद्र लिमये (जग्गु…), विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत (झिम्मा २), सहाय्यक अभिनेता संतोष जुवेकर (रावरंभा), सहाय्यक अभिनेत्री उषा नाईक (आशा), बालकलाकार कबीर खंदारे, त्रिशा ठोसर (नाळ २), विशेष बालकलाकार भार्गव जगताप (नाळ २), कथा सुधाकर रेड्डी (नाळ २), पटकथा शशी खंदारे (जिप्सी), संवाद अंबर हडप व गणेश पंडित (जग्गु…), गीते वैभव देशमुख (नाळ २), पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर (नाळ २), नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे, संजीर हाउलदार (जग्गु…), कला दिग्दर्शन अमेय भालेराव (श्यामची आई), छायालेखन प्रविण सोनवणे (जिप्सी), संकलन अक्षय शिंदे (जिप्सी), ध्वनीमुद्रण कुणाल लोळसुरे (श्यामची आई), ध्वनिसंयोजन विकास खंदारे (जिप्सी), वेशभूषा मानसी अत्तरदे (जग्गु…), रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस), प्रथम पदार्पण अभिनेता दीपक जोइल (भेरा), अभिनेत्री श्रद्धा खानोलकर (भेरा), गौरी देशपांडे (श्यामची आई), प्रथम पदार्पण दिग्दर्शक आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट), प्रथम पदार्पण निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी), सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक दीपक पाटील, ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक शशी खंदारे. विशेष सन्मान – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ‘श्यामची आई’.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!