
टाकरखेडा येथील माध्यमिक विद्यालयात दहावीचा वार्षिक निरोप समारंभ उत्साहात पार पडला.!!!
अमळनेर प्रतिनिधी :- रवींद्र वाघ
टाकरखेडा येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आयोजित वार्षिक निरोप समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. मनोज पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक व महत्त्वाचे वर्ष असून, याच टप्प्यावर त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याची दिशा ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करून उच्च यश संपादन करावे. आपली गुणवत्ता वाढवून शाळेचे नाव जिल्हा व राज्य पातळीवर उज्ज्वल करावे. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद श्री. शशिकांत पाटील, श्री. जगतराव पाटील, श्री. संदीप सर, श्री. जितेंद्र वाघ, श्री. निलेश जाधव, श्री. निलेश पाटील, वानखेडे मॅडम, श्रीमती योगिता मॅडम, श्री. हर्षल पाटील, श्री. राहुल पुकळे, श्री. पिंजारी दादा व वना बापू उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगत व भाषणातून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी दिलेल्या प्रेमळ मार्गदर्शनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव कथन करताना भावनिक क्षण उपस्थितांपर्यंत पोहोचवले, त्यामुळे सभागृहात भावनाप्रधान वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक करण्यात आले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा निरोप समारंभ यशस्वी व संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.



