सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी. शेतकरी संघटनेचे भडगाव तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन.
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी संघटना, भडगाव यांच्या वतीने भडगाव तहसीलदार शितल सोलाट तसेच तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची व प्रति हेक्टर १ लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे कापुस, सोयाबीन, मका, केळी, भाजीपाला तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली असून, काही ठिकाणी पशुधनाचेही नुकसान झाले आहे. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, घरगुती साहित्य व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावेत. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना शासनाने विशेष बाब म्हणून प्रति हेक्टर किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. पशुधन व घरांच्या नुकसानीसाठीही तातडीने आर्थिक मदत मंजूर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
यावेळी तहसीलदार शितल सोलाट यांच्या वतीने नायब तहसीलदार आर. एस. भामरे यांनी निवेदन स्वीकारले. तसेच तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, दिगंबर तांबे आणि अनिल तायडे यांनी कृषी विभागाच्या वतीने निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, डॉ. योगेश गोसावी, रामकृष्ण माळी, लीलाधर पाटील, संजय खैरनार, गौतम अहिरे, परशुराम माळी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करावी. प्रशासनाने विलंब न करता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.





