क्राईमजळगाव

रामनगर (कासोदा) येथे बंद घर फोडून १ लाख ६५ हजार रुपयांची चोरी.!!!

रामनगर (कासोदा) येथे बंद घर फोडून १ लाख ६५ हजार रुपयांची चोरी.!!!

 

कासोदा प्रतिनिधी :-

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रामनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

रामनगर येथे वास्तव्यास असलेले रमणलाल नथू सोनार (वय ६९) हे पत्नीसमवेत दवाखान्याच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील नवसारी येथे दि. १५ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत गेले होते. सहा दिवस घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

दि. २१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास सोनार दाम्पत्य नवसारी येथून परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ घराची पाहणी केली असता घरातील दोन बेडरूममधील लोखंडी कपाटे उघडलेली असून त्यातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तसेच देवघरातील कपाटाचे लॉकरही उघडे होते.

सखोल तपासणी केल्यानंतर पुढील मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले —

देवघरातील १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे देव, किंमत अंदाजे ₹२५,०००

१० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोथ, किंमत अंदाजे ₹७०,०००

₹७०,००० रोख रक्कम, जी ₹१०, ₹५० व ₹५०० च्या भारतीय चलनातील नोटांमध्ये होती

अशा प्रकारे एकूण ₹१,६५,००० किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये घरात ठेवलेली काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्यांनी उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी रमणलाल नथू सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २१ जानेवारी रोजी रात्री ९.२७ वाजता कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राकेश खोडे, पोलीस नाईक नरेंद्र पाटील व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहेत. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, बंद घरांवर विशेष लक्ष ठेवण्याची व रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!