एकाच पिठाचे पदार्थ, पण आरोग्यासाठी जास्त चांगलं काय? इडली की डोसा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.?
इडली आणि डोसा हे दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय नाश्त्याचे पदार्थ आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही पदार्थ तांदूळ आणि उडीद डाळीच्या एकाच आंबवलेल्या पिठापासून तयार केले जातात. मात्र, बनवण्याची पद्धत, तेलाचा वापर आणि पौष्टिक मूल्यांमधील फरकामुळे आरोग्याच्या दृष्टीने दोघांमध्ये काही महत्त्वाचे भेद आढळतात.
तज्ज्ञांच्या मते, इडली वाफेवर शिजवली जात असल्याने त्यात तेलाचा वापर होत नाही. त्यामुळे ती कमी कॅलरी, कमी फॅट आणि पचायला हलका आहार मानला जातो. आंबवलेल्या पिठामुळे त्यातील पोषक घटक शरीराला सहज उपलब्ध होतात आणि पचनसंस्थेचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारातून बरे होत असलेल्या व्यक्तींसाठी इडली हा उत्तम नाश्त्याचा पर्याय मानला जातो.
दुसरीकडे, डोसा तव्यावर भाजला जात असल्याने त्यासाठी थोड्या प्रमाणात तेल किंवा तुपाचा वापर केला जातो. मात्र, कमी तेलात तयार केलेला डोसा देखील पौष्टिक ठरू शकतो. डोशामध्ये भाज्या, पनीर किंवा अंड्याचा समावेश करून त्याचे पोषणमूल्य आणखी वाढवता येते. डोसा खाल्ल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. त्यामुळे जास्त शारीरिक श्रम करणारे किंवा दिवसभर सक्रिय राहणाऱ्या व्यक्तींसाठी तो चांगला पर्याय ठरतो.
मधुमेह आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही इडली आणि कमी तेलात बनवलेला डोसा हे दोन्ही फायदेशीर मानले जातात. मात्र, दोन्ही पदार्थ सांबार आणि भरपूर भाज्यांसोबत खाल्ल्यास अधिक संतुलित आहार मिळतो. नारळाच्या चटणीचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
याशिवाय, तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार होत असल्यामुळे इडली आणि डोसा हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री पदार्थ आहेत. त्यामुळे ग्लूटेनची ॲलर्जी किंवा सेलियाक आजार असलेल्या व्यक्तींसाठीही हे सुरक्षित पर्याय ठरू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, आरोग्याच्या दृष्टीने इडलीला किंचित अधिक प्राधान्य दिले जाते, कारण ती वाफेवर शिजवली जाते आणि त्यात तेल नसते. मात्र, कमी तेलात तयार केलेला डोसा देखील तितकाच पौष्टिक आहे. त्यामुळे कोणता पदार्थ अधिक चांगला हे ठरवण्यापेक्षा तो किती प्रमाणात आणि कोणत्या पदार्थांसोबत खाल्ला जातो, याला अधिक महत्त्व आहे. संतुलित आहार आणि योग्य प्रमाण हेच उत्तम आरोग्याचे खरे रहस्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.





