कारसोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी
शैलेश पांडे कासोदा प्रतिनिधी :-
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कारसोदा ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी देण्यात आलेली लाखो रुपयांची ई-रिक्षा सध्या पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या मते, गावातील स्वच्छता व्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओला व सुका कचरा संकलनासाठी ही ई-रिक्षा सुरुवातीला काही दिवस वापरात होती. मात्र, त्यानंतर ती ग्रामपंचायत कार्यालयामागील परिसरात उभी करण्यात आली असून आज तिच्यावर धुळीचा जाड थर साचलेला दिसून येतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित होत आहेत.
स्थानिकांनी सांगितले की, देखभाल खर्च, बॅटरी चार्जिंगच्या अडचणी, वाहन पलटी होण्याच्या घटना तसेच चालक व मानधनाची व्यवस्था नसल्यामुळे ही वाहने बंद पडली आहेत. परिणामी, सध्या गावात कचरा संकलन ट्रॅक्टर व घंटागाडीच्या माध्यमातून केले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून वाहन पुरविल्यानंतर त्याच्या वापराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उघड्यावर ठेवलेल्या वाहनामुळे त्याचे तांत्रिक नुकसान होत असून संपूर्ण स्वच्छता यंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, “जनतेच्या पैशातून घेतलेली वाहने वापरात नसतील तर हा निधीचा अपव्यय नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन वाहन दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणावे, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.





