५ एकर नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायातून २८ लाखांचे उत्पन्न,इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हर्षल पाटील यांचा यशस्वी प्रयोग

Spread the love
55 / 100 SEO Score

५ एकर नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायातून २८ लाखांचे उत्पन्न,इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हर्षल पाटील यांचा यशस्वी प्रयोग

 

भडगाव वार्ताहर :

तालुक्यातील वाडे येथील तरुण शेतकरी हर्षल अशोक पाटील यांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेतीत उतरून नैसर्गिक भाजीपाला शेती व दुग्धव्यवसायाचा यशस्वी संगम साधला आहे. या उपक्रमातून ते वर्षाकाठी सुमारे २७ ते २८ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवत असून त्यांच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे.

हर्षल पाटील यांनी ५ एकर क्षेत्रात कारले, गिलके, दोडके, गवार, भेंडी, वांगे, मिरची यांसह एकूण १८ प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. ही लागवड वर्षातून दोन टप्प्यांत केली जाते. विशेष म्हणजे या शेतीत रासायनिक खते किंवा औषधांचा वापर न करता पूर्णतः नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला जातो.

शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी १३५ गिर गायींचे पालन केले असून दुग्धव्यवसायही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज सुमारे १३५ ते १४० लिटर दूध मिळते. या दुधापासून तूप तयार करून त्याची विक्री केली जाते. तसेच गोमूत्र, ताक, जीवामृत व बिजामृत यांचा वापर भाजीपाला पिकासाठी केला जातो.

भाजीपाला उत्पादनासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व मंडप पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पिकांना गूळ व खाण्याचा सोडा ठिबकद्वारे दिला जातो. पूर्णपणे विषमुक्त व ताजा भाजीपाला तयार करून तो वाडे ते धुळे असा सुमारे ६० किलोमीटर अंतर पार करत ग्राहकांना घरपोच दिला जातो. यासाठी व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आला असून सुमारे ४० डॉक्टरांसह अनेक ग्राहक नियमित भाजीपाला खरेदी करतात.

आर्थिकदृष्ट्या पाहता ५ एकर भाजीपाला शेतीसाठी वर्षाकाठी २ ते ३ लाख रुपये खर्च येतो, तर यातून सुमारे १४ ते १५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दुग्धव्यवसायासाठी सुमारे ७ लाख खर्च येतो, तर त्यातून १३ लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. अशा प्रकारे दोन्ही व्यवसायातून मिळून एकूण २७ ते २८ लाख रुपयांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे

हर्षल पाटील यांचे वडील प्रा. अशोक डिगांबर पाटील (सेवानिवृत्त) यांच्या मालकीची १५ एकर शेती असून पूर्वी पारंपरिक पिके घेतली जात होती. मात्र हर्षल यांनी बी.ई. (ऑटोमोबाईल) पूर्ण केल्यानंतर शेतीत नवीन प्रयोग सुरू केले.

“नैसर्गिक शेतीमुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. दुग्धव्यवसायाच्या मदतीने शेती अधिक सक्षम होते,” असे हर्षल पाटील यांनी सांगितले.

नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायाचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असून हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

फोटो कॅप्शन :

1. वाडे येथे भाजीपाला काढताना शेतकरी हर्षल पाटील व मजूर.

2. गायींपासून जीवामृत तयार करताना प्रा. अशोक पाटील व शेतातील भाजीपाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top