कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!!
कासोदा प्रतिनिधी (शैलेंश पांडे) :-
उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना कासोदा गावात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांक १ मधील शेलार गल्ली (गढी परिसर) येथे रविवारी दि. २६ एप्रिल नळाद्वारे आलेले पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात आधीच १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अशा निकृष्ट दर्जाच्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना उपलब्ध साठ्याचे योग्य शुद्धीकरण न करता थेट पुरवठा केला जात असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गढूळ पाणी, शेवाळ व कचरा आढळला
गेल्या काही दिवसांपासून गावातील विविध भागांत नळाद्वारे येणारे पाणी गढूळ असून त्यामध्ये शेवाळ, कचरा व इतर घाण मिसळलेली दिसत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून घरगुती वापरासाठीही अयोग्य ठरत आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवले असता त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
जलजन्य आजारांचा धोका
दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्याचे नागरिक सांगतात. खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
“पाणीपट्टी भरूनही स्वच्छ पाणी नाही”
“आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला शुद्ध पाणी मिळत नाही. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीकडे दुर्लक्षाचे आरोप
या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी यंत्रणा कार्यरत आहे का, क्लोरीनचा वापर योग्य प्रमाणात केला जातो का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आमदारांकडून हस्तक्षेपाची अपेक्षा
पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून कासोदा गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





