भडगावात साधेपणाचा आदर्श; मुख्याध्यापक नाजीम सर यांनी मुलाचा निकाह करून दिला समाजाला नवा संदेश.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
आजच्या काळात विवाह समारंभ म्हटला की लाखो रुपयांचा खर्च, भपकेबाज सजावट, दिखावा आणि आर्थिक ओझे हे चित्र सर्वसामान्य झाले आहे. अनेक कुटुंबे समाजातील प्रतिष्ठेच्या नावाखाली कर्ज काढून विवाह सोहळे पार पाडतात. अशा परिस्थितीत भडगाव येथील Anglo Urdu High School चे मुख्याध्यापक नाजीम सर यांनी आपल्या मुलाचा निकाह अत्यंत साध्या, सुसंस्कृत आणि इस्लामी तत्त्वांनुसार पार पाडत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
भडगाव शहरात चर्चेचा विषय ठरलेला साखरपुडा नुकताच विवाहबंधनात रूपांतरित झाला. वधू शाजिया अतिक बेग आणि वर मोहम्मद समी नाजीम बेग मिर्झा यांचा निकाह कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधेपणा. इस्लाम धर्मात निकाह सोपा, सुलभ आणि कमी खर्चात करण्याचा संदेश दिला गेला आहे. मात्र आज अनेक ठिकाणी विवाह सोहळे प्रतिष्ठेची स्पर्धा बनत चालले आहेत. त्यातून विशेषतः मुलीच्या कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नाजीम सर यांनी आपल्या मुलाच्या विवाहात अनावश्यक खर्च, दिखावा आणि आडंबर यांना पूर्णपणे फाटा दिला.
शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे देणाऱ्या नाजीम सर यांनी आपल्या कृतीतूनही समाजाला महत्त्वाचा संदेश दिला. विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र संस्कार असून तो आर्थिक स्पर्धेचे साधन बनू नये, असे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थित नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली असून अनेकांनी याचे स्वागत केले.
उद्योजक नासिर मिर्झा तसेच हॅट्रिक नगरसेवक आसिमभाऊ मिर्झा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सामाजिक सलोखा, आपुलकी आणि कुटुंबीय मूल्यांचे दर्शन घडले. विवाह सोहळ्यात धार्मिक परंपरा जपत सर्व व्यवस्था शिस्तबद्ध आणि साधेपणाने करण्यात आली होती.
यावेळी मुफ्ती शकील साहब, हाफिज युनूस साहिब, हाफिज वसीम अहमद साहिब, हाफिज अकील साहिब, आसिम मिर्झा , मिर्झा मुकीम, आसिफ पठाण, नासीर मिर्झा (भिवंडी), हाजी नाझिम खाटीक , हाजी झाकीर कुरेशी,नगरसेवक सय्यद इम्रान अली , बब्बू शेठ, हाजी मोहसीन खाटीक , हाजी रियाजुद्दीन साहेब हाजी अल्ताफ खाटीक नगरसेवक हाजी खलील शेख,डॉ. वसीम मिर्झा, डॉ आदिल अमान, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजात वाढत चाललेला विवाहातील अवाजवी खर्च, हुंड्याची मानसिकता आणि दिखाव्याची प्रवृत्ती याविरोधात हा निकाह एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. “लग्नातील खर्च कमी करा, मुलीच्या कुटुंबावर अनावश्यक भार टाकू नका आणि साधेपणाला प्राधान्य द्या” हा संदेश या विवाहातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
भडगाव शहरात या आदर्श विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून नाजीम सर यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. नवदांपत्याला शुभेच्छा देतानाच अनेकांनी अशा प्रकारचे साधे, सुसंस्कृत आणि समाजहिताचा विचार करणारे विवाह भविष्यात अधिक प्रमाणात व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

