भडगावात गुणगौरवाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा गौरव,प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे करिअर नियोजनावर मोलाचे विचार
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना प्रेरणा देणारा भव्य गुणगौरव सोहळा स्व. बापूजी युवा फाउंडेशन, भडगाव यांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हजारो विद्यार्थी, पालक, युवक-युवती व नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमात भडगाव तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच कै .शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिका नगरपरिषद व सारथी अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींचाही विशेष सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी “युवा पिढी आणि बदलत्या काळातील आव्हाने” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी योग्य मित्रांची निवड, मोबाईलचा मर्यादित वापर, आई-वडिलांशी सुसंवाद, वेळेचे नियोजन आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “तुमचा मित्र तुमचे आयुष्य घडवतो. त्यामुळे योग्य संगत निवडा. सोशल मीडियापेक्षा कुटुंबासोबत संवाद वाढवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार, शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ध्येय निश्चित करावे, स्वप्न मोठी असावीत, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटीची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे योगदान अनमोल असल्याचे नमूद करून त्यांनी पालकांनाही मुलांशी संवाद वाढविण्याचे आवाहन केले.
यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज अनेक विद्यार्थी केवळ एमपीएससी आणि यूपीएससी या दोनच परीक्षांकडे करिअर म्हणून पाहतात. मात्र या व्यतिरिक्तही अनेक क्षेत्रांमध्ये उज्ज्वल संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून योग्य क्षेत्राची निवड करावी. पालकांनीही मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि आवडीनुसार त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.
आमदार पाटील यांनी स्व. बापूजी युवा फाउंडेशनचे प्रमुख लखीचंद पाटील यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि गुणवंतांचा सन्मान अशा विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा रेखा मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, शिवसेना गटनेते लखीचंद पाटील, नगरसेविका सौ. समीक्षा पाटील, युवराज पाटील, इमरान अली सय्यद, विजय भोसले, अलिम शाह, रावसाहेब पाटील, जितेंद्र आचारी, अतुल परदेशी, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार मार्गदर्शन आणि आवश्यक संधी उपलब्ध करून दिल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
हजारो युवक-युवती, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव, यशस्वी युवकांचा सन्मान आणि प्रेरणादायी विचारांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा भडगाव तालुक्यातील युवा चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरला.
“गुणवंतांचा गौरव आणि कर्तृत्ववानांचा सन्मान हीच उज्ज्वल समाजनिर्मितीची खरी पायाभरणी आहे,” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





