ऐन उन्हाळ्यात हवामानाचा मोठा पलटवार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :-
देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असतानाच हवामान विभागाने काही राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा जारी केला आहे. उत्तर आणि मध्य भारतात पुढील काही दिवस उकाडा कायम राहणार असला तरी ईशान्य भारत, किनारी भाग आणि काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 22 ते 25 मेदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज असून 23 आणि 24 मे रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अंडमान-निकोबार बेटे, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही 19 ते 25 मेदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

