माहिंदळे ग्रामस्थांचे जलटंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू

माहिंदळे ग्रामस्थांचे जलटंचाई विरोधात आमरण उपोषण सुरू

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील मौजे माहिंदळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. गावातील तीव्र पाणीटंचाई व वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालय भडगाव येथे देविदास पाटील, पर्थीराज पाटील, राजेंद्र पाटील व सुनील पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पाइपलाइनसह विविध तांत्रिक त्रुटींमुळे गावाला नियमित पाणी मिळत नाही. वारंवार पाणीपुरवठा बंद पडत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागांकडे निवेदन सादर करून समस्या मांडली होती. त्यावेळी प्रशासनाकडून आठ दिवसांत दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना गावातील पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कामाची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि गावाचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

या आंदोलनास गावातील नागरिकांचा मोठा पाठिंबा असून निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने तातडीने प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *