जळगाव जिल्ह्यात पेट्रोलटंचाईच्या अफवा; प्रशासनाकडून नागरिकांना संयमाचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी :-
शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी वाहतूक कोंडी व गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या सर्व अफवांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात खरेदी टाळावी. अशा प्रकारच्या कृतीमुळेच अनावश्यक टंचाईची भावना निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करताना त्यांनी नागरिकांनी वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे सांगितले. इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी, असे आवाहन करत जिल्हा प्रशासनाने शांतता, संयम व सहकार्य राखण्याचे आवाहन केले आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.