कराब शिवारातील पानंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी
‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता’ योजनेअंतर्गत रस्ता करून देण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
भडगाव प्रतिनिधी :-
कराब शिवारातील कोठेली रोड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हा रस्ता ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता’ शासन निर्णयानुसार करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी भडगाव तहसीलदारांकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
कराब शिवारातील कोठेली रोड परिसरातून अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी या पानंद रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, रस्त्याची दुरवस्था, पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात दुचाकी, ट्रॅक्टर तसेच शेतीमाल वाहून नेणारी वाहने शेतापर्यंत नेणे कठीण होत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शासन निर्णयानुसार कार्यवाहीची मागणी
संबंधित पानंद रस्त्याची भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी करून हद्द निश्चित करावी, तसेच ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या समन्वयातून शासन निर्णयानुसार रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्ता सुस्थितीत झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत, बियाणे व खते शेतापर्यंत पोहोचविणे, शेतीमाल बाजारपेठेत नेणे तसेच पावसाळ्यात शेतात ये-जा करणे सुलभ होणार आहे.
निवेदनासोबत कराब शिवारातील पानंद रस्त्याचा नकाशा व संबंधित गट क्रमांकांची माहिती जोडण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह ही मागणी प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे.
प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने महसूल विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि शासन निर्णयानुसार पानंद रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे कराब शिवारातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





