नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भडगावात कॅन्डल मार्च; मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, पारदर्शक चौकशीची मागणी
भडगाव प्रतिनिधी :-
देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भडगाव शहरात विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून कॅन्डल मार्च काढून मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी हा शांततापूर्ण मार्च आयोजित करण्यात आला.
देशभरात नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भडगाव येथेही विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. सहभागी युवकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून कॅन्डल मार्च काढला आणि दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.
या कॅन्डल मार्चचे नियोजन परिक्षित पाटील, चेतन खैरनार, नीरज खैरनार, रविंद्र वाडेकर आणि कल्पेश सांगवीकर यांनी केले. मार्चची सुरुवात भडगाव नगरपालिका येथून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसीलदार कार्यालयासमोर मार्चचा समारोप झाला.
यावेळी डॉ. अतुल देशमुख आणि डॉ. दिनेश तांदळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राहण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात हाजी जाकीर कुरेशी, रविंद्र पाटील, संजय सोनार कळवाडीकर, योगेश शिंपी, गणेश देशमुख, विक्रम सोनवणे, यशराज निकम, हेमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिक सहभागी झाले. कॅन्डल मार्च शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी भडगाव पोलीस विभागाने आवश्यक सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दिवंगत विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





