जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्त
जळगाव प्रतिनिधी:-
जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तल करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या कारवाईत जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५ व २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली. धरणगाव, यावल, भडगाव, रावेर, चाळीसगाव, सावदा, पाचोरा, एरंडोल, कासोदा, अडावद, पहूर आदी भागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १४ वाहने जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत ४६ लाख १० हजार रुपये इतकी आहे. तसेच ७८ जिवंत गोवंश (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी) यांची सुटका करण्यात आली. अवैधरीत्या कत्तल केलेले सुमारे ४६३ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १५ लाख २३ हजार २३० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
याप्रमाणे एकूण कारवाईची आर्थिक उलाढाल सुमारे ६१ लाख ३३ हजार २३० रुपये इतकी असून, जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक व कत्तल साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) व संदीप गावीत (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी केली.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर मोटार परिवहन विभागामार्फत स्वतंत्र दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. जिल्ह्यात गोवंश वाहतूक, विक्री व कत्तल करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





